- संस्कारातून यशाकडे हिच लोकमान्य संस्थेची अमृत परंपरा भद्रावतीत लोकमान्य संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षाचा भव्य समारोपीय सोहळा

चंद्रपूर – शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था असतात; मात्र स्वर्गीय निलकंठराव गुंडावार यांनी स्थापन केलेली लोकमान्य संस्था ही केवळ पदव्या बहाल करणारी न राहता संस्कार, मूल्ये आणि चारित्र्यनिर्मितीची भक्कम परंपरा जपणारी संस्था ठरली असल्याचे मत आमदार मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. या संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण मेहनत आणि संस्कारांच्या बळावर यशाचे शिखर गाठावे, असे प्रेरणादायी आवाहन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यावेळी केले.

भद्रावती येथील लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय आणि लोकमान्य ज्ञानपीठ यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित समारोपीय कार्यक्रम उत्साहात पार पडला.प्रमुख अतिथी म्हणून राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रकांत गुंडावार होते. यावेळी बळवंतराव गुंडावार, मनोहरराव पारधे, नामदेवराव कोल्हे, उमाकांत गुंडावार, उल्हास भास्करवार, गोपाळराव ठेंगणे, अमित गुंडावार, रूपचंद धरणे, आशिष गुंडावार, सचिन सरपटवार, सौ. पूनम ठावरी यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी-विद्यार्थिनी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाला उपस्थित राहताना अत्यंत समाधान आणि आनंद झाल्याची भावना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था असतात; मात्र स्वर्गीय निलकंठराव गुंडावार यांनी स्थापन केलेली लोकमान्य संस्था केवळ पदव्या बहाल करणारी न राहता संस्कार, मूल्ये आणि चारित्र्यनिर्मितीची भक्कम परंपरा जपणारी संस्था ठरली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.अमृत महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या या संस्थेच्या वाटचालीचे कौतुक करत आ.मुनगंटीवार यांनी संस्थाचालक, शिक्षकवृंद आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. मूल्याधिष्ठित शिक्षणाच्या ध्येयासाठी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या लोकमान्य संस्थेने गेल्या अनेक वर्षांत हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवले असून ही गौरवशाली परंपरा पुढेही अखंड सुरू राहावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांच्या जीवनप्रवासाला नवी दिशा देतात. ‘लोकमान्य’ तोच ठरतो जो अथक परिश्रमातून स्वतःवर विजय मिळवतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने मेहनत, सातत्य आणि चिकाटीच्या जोरावर यशाचे शिखर गाठावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संदेश देताना त्यांनी मोठी स्वप्ने पाहा, खूप शिका आणि आपल्या शहराचा तसेच राज्याचा गौरव वाढवा, असे आ.मुनगंटीवार यांनी सांगितले. तुमच्या कर्तृत्वातून इतरांच्या जीवनात गोडवा निर्माण होणारे कार्य घडावे, हीच खरी समाजसेवा असल्याचे त्यांनी नमूद केले. लोकमान्य संस्थेची स्थापना करताना स्व. निलकंठराव गुंडावार यांचा उद्देश केवळ शिक्षण देण्यापुरता मर्यादित नव्हता, तर प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये संस्कार रुजावेत, हा होता, याची आठवण त्यांनी करून दिली.
अमृत महोत्सवी वर्ष म्हणजे केवळ यशाचा उत्सव नव्हे, तर ज्ञानासोबत संस्कारांची सांगड घालणारी परंपरा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केवळ ज्ञान नव्हे तर गुण आणि मूल्येही तितकीच महत्त्वाची असल्याचे आ.मुनगंटीवार यांनी यावेळी अधोरेखित केले.








