Advertisement

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करा.आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश.

आमदार मुनगंटीवार यांच्या सूचनेनंतर भाजपा पदाधिकाऱ्यांची शेताच्या बांध्यावर प्रत्यक्ष पाहणी.

चंद्रपूर : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी धाव घेतली आणि जिल्हाधिकाऱ्यांना पिकांचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिलेत. दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेला अवकाळी पाऊस व वादळामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर आमदार श्री. मुनगंटीवार यांनी तातडीने पुढाकार घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रशासनाला आवश्यक निर्देश दिले आहेत. यासोबतच आ. मुनगंटीवार यांच्या सूचनेनंतर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

अवकाळी पावसामुळे मक्का, गहू, मिरची, चणा, कापूस व ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सावली, मुल, पोंभुर्णा, बल्लारपूर, गोंडपिपरी आणि चंद्रपूर या तालुक्यांमध्ये त्याचा तीव्र फटका बसला आहे. अनेक ठिकाणी काढणीला आलेली पिके जमीनदोस्त झाली असून काही भागांत मका पीक पूर्णपणे आडवे पडले आहे.

या पार्श्वभूमीवर आ. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला तात्काळ शेतांची पाहणी करून पंचनामे करण्याचे निर्देश दिले. पंचनामा करताना कोणत्याही शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार बल्लारपूर, सावली, मुल आणि पोंभुर्णा तालुक्यांमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा असे निर्देश दिले. त्यानुसार माजी आमदार अतुल देशकर, जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, महामंत्री मंगेश गुलवाडे,सावली तालुका अध्यक्ष किशोर वाकुडकर, तालुका अध्यक्ष हरीश ढवस, विजय गुरनुले, अनिल मोरे, राजू बुद्धलवार, सरपंच फलींद्र सातपुते, प्रमोद कळसकर, राहुल संतोषवार तसेच कृषी मूल्य आयोगाचे सदस्य बंडू गौरकर यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व कृषी व महसूल विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या शेतांची पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी, तसेच या कठीण काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा विश्वास दिला.

The Patil News