Administration
Our Team Admin LoginConnect With Us
YouTube Facebook Instagram Twitter WhatsAppContact Us
thepatilnews@gmail.com
+91 8390794833, 9604938312
Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा विकसित भारताच्या यात्रेला गती देणारा, देशाच्या आकांक्षा आणि नवभारताचा आत्मविश्वास स्पष्टपणे प्रतिबिंबित करणारा असल्याची ठाम प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली आहे. या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, युवक, कामगार, मध्यमवर्ग तसेच लघु व मध्यम उद्योगांना केंद्रस्थानी ठेवत, देशाच्या आर्थिक बळकटीसाठी दूरदृष्टीपूर्ण आणि निर्णायक पावले उचलण्यात आली आहेत.
हा अर्थसंकल्प आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला अधिक बळ देणारा असून, देशाच्या सर्वांगीण विकासाचा ठाम रोडमॅप मांडणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम, निर्णायक आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली आज भारत केवळ देशांतर्गतच नव्हे, तर जागतिक पातळीवरही आर्थिक, सामरिक आणि राजनैतिक दृष्ट्या भक्कम स्थान मिळवून उभा आहे. जागतिक व्यासपीठावर भारताचा आवाज आता दुर्लक्षित करता येणार नाही, ही वस्तुस्थिती या अर्थसंकल्पातून अधिक ठळकपणे दिसत आहे.
कृषी क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदींमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार असून, ग्रामीण भारताला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा सरकारचा स्पष्ट संकल्प या अर्थसंकल्पातून दिसून येतो. एमएसएमई क्षेत्रासाठी १० हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद करून लघु व मध्यम उद्योगांना नवसंजीवनी देण्यात आली असून, यामुळे रोजगारनिर्मितीचा वेग मोठ्या प्रमाणात वाढेल, असे आ. किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.महिला उद्योजकांना सक्षम करण्यासाठी ‘शी-मार्ट्स’ आणि स्वयं-सहायता गटांसाठी ‘उद्योजक मार्ट्स’ स्थापन करण्याचा निर्णय हा महिला सक्षमीकरणापुरता मर्यादित न राहता, महिलांना आर्थिक नेतृत्व देणारा ठोस निर्णय आहे. शेती व पीक उत्पादन वाढवण्यासाठी एआय आधारित टूल्सचा वापर करून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा सरकारचा निर्धार या अर्थसंकल्पातून स्पष्ट होतो.
पशुपालनासाठी कर्ज-संबंधित अनुदान योजना, मत्स्यपालनाला चालना देण्यासाठी ५०० नवीन जलाशयांची उभारणी, तसेच समावेशक विकासावर भर देत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा निर्णय हा ग्रामीण भागांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मैलाचा दगड ठरेल. १५,००० माध्यमिक शाळांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब, २०३० पर्यंत २० लाख कुशल व्यावसायिकांची निर्मिती आणि कॅन्सरवरील १७ औषधांच्या किमती कमी करण्यासारखे निर्णय हे सामाजिक न्याय आणि लोकहिताचा सरकारचा स्पष्ट अजेंडा दर्शवतात.
‘विकसित भारत’ हे केवळ स्वप्न नसून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ते प्रत्यक्षात साकार होत आहे. त्या दिशेने टाकलेले हे ठोस, निर्णायक आणि ऐतिहासिक पाऊल असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी ठामपणे सांगितले.
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: