कै. अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अभ्यासू, अनुभवी आणि ठाम विचारांचे नेतृत्व होते. मतभेद असले तरी विचारांचा आदर राखणे, आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपणे—ही त्यांची खरी ओळख होती. त्यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्रात एक स्पष्ट वक्ता, आणि वैयक्तिक आयुष्यात एक सहृदय मित्र आपण गमावला आहे, अशा शब्दात माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शोकभावना व्यक्त केली व्यक्त केली आहे.
अजितदादांचा स्वभाव हा नेहमीच स्पष्ट आणि निर्भीड वक्तेपणाचा राहिला. जे योग्य वाटे ते त्यांनी कोणताही आडपडदा न ठेवता मांडले. सत्ता, विरोध किंवा समीकरणे यापेक्षा जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणारी त्यांची भूमिका अनेकदा राजकीय चर्चांना दिशा देणारी ठरली. मतभिन्नता असूनही परस्पर सन्मान राखण्याची त्यांची शैली आजच्या राजकारणात दुर्मिळ म्हणावी अशी होती.
विधानसभा असो वा सार्वजनिक व्यासपीठ त्यांचे बोलणे ठाम, मुद्देसूद आणि आशयघन असे. राजकारण हे केवळ पदांचे नव्हे, तर मूल्यांचे असते, ही जाणीव त्यांच्या वागण्यातून कायम प्रकट होत असे. त्यामुळेच सहकारी असोत वा विरोधक, सर्वांच्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना होती. विकासासाठी प्रत्येकाला मदत करण्याचा त्यांचा स्वभाव होता. दातृत्व या शब्दातला दा हा दादा या विशेषणात दडला आहे.
व्यक्तिगत पातळीवर ते एक आपुलकीचे, संवेदनशील आणि विश्वासू मित्र होते. राजकीय मतभेद कधीही वैयक्तिक नात्यांच्या आड येऊ नयेत, हा त्यांचा आग्रह होता. अनेकदा त्यांच्या स्पष्ट, प्रामाणिक शब्दांनी मार्गदर्शन लाभले; आज तेच शब्द आठवणींतून अंतःकरणाला भिडत आहेत.
आज अजितदादा आपल्यात नाहीत, याची जाणीव मन सुन्न करणारी आहे.आबालवृद्धासाठी नेहमी तत्पर राहणारा त्यांचा अजितदादा, सकाळी सहा वाजता पासून जनसेवेसाठी तत्पर राहणारा हा लोकनेता आता आपल्यात नाही ही कल्पना सहन होत नाही.
त्यांचा आवाज शांत झाला असला, तरी त्यांनी जपलेले मूल्य, त्यांची राजकीय भूमिका आणि माणुसकीचा वारसा कायम स्मरणात राहील.कै. अजितदादा पवार यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या कुटुंबीयांना, सहकाऱ्यांना व असंख्य समर्थकांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो. अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.








