Advertisement

प्रशिक्षित कार्यकर्ता पक्षाची खरी ताकद – आमदार किशोर जोरगेवार.

बोर्डा येथे भारतीय जनता पार्टीचे दोन दिवसीय जिल्हा महानगर प्रशिक्षण वर्ग.

प्रशिक्षण महाअभियान कार्यक्रम म्हणजे संघटनात्मक शक्ती अधिक मजबूत करण्याचा, कार्यकर्त्यांना सक्षम बनवण्याचा आणि जनतेच्या विश्वासाला अधिक दृढ करण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. कोणतीही संघटना केवळ घोषणांनी मोठी होत नाही, तर तळागाळात निष्ठेने, शिस्तबद्ध पद्धतीने आणि समर्पणाने काम करणार्या प्रशिक्षित कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे ती अधिक सक्षम बनत असते. प्रशिक्षित कार्यकर्ता पक्षाची खरी ताकद असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

बोर्डा येथे भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर च्या वतीने “पंडित दीनदयाल उपाध्याय जिल्हा प्रशिक्षण महाअभियान 2026” अंतर्गत दोन दिवसीय जिल्हा महानगर प्रशिक्षण वर्ग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, एक कार्यकर्ता हा केवळ झेंडा घेऊन चालणारा व्यक्ती नसून तो संघटनेचा चेहरा, विचारांचा वाहक आणि जनतेच्या आशा-अपेक्षांचा प्रतिनिधी असतो. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता सक्षम, जागरूक, अभ्यासू आणि संवादकुशल असणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या व्यावहारिक सत्रामागचा उद्देश प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये नेतृत्व क्षमता निर्माण करणे, विषयांची सखोल समज वाढवणे आणि समाजामध्ये प्रभावीपणे काम करण्याची ताकद निर्माण करणे हा असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

आजच्या स्पर्धात्मक युगात लोकांना केवळ आश्वासन नको, तर विश्वास हवा आहे. भाषणांपेक्षा प्रत्यक्ष काम दिसले पाहिजे आणि हा विश्वास निर्माण करण्याचे सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे संवाद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी सोशल मीडिया आणि मीडिया व्यवस्थापनाचे महत्त्वही विशद केले. योग्य माहिती आणि प्रभावी संवादामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होते, तर चुकीच्या माहितीमुळे गैरसमज पसरू शकतात. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने प्रेस नोट लेखन, पत्रकारांशी संवाद, प्रेस कॉन्फरन्सचे नियोजन तसेच सोशल मीडियाचा प्रभावी वापर याचे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. “आपली प्रतिमा ही आपल्या वर्तनातून आणि संवादातून तयार होत असते,” असे सांगत प्रतिक्रिया देताना संयम, स्पष्टता आणि तथ्य यांना प्राधान्य द्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

संघटना मजबूत करण्यासाठी कार्यालय व्यवस्थापन, डेटा व्यवस्थापन, रिपोर्टिंग, कागदपत्रांची योग्य देखभाल, नियमित आढावा आणि कामांचे निरीक्षण या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “जिथे नियोजन असते, तिथे यश निश्चित असते,” असे सांगत त्यांनी संघटनात्मक शिस्तीवर भर दिला.

निवडणूक व्यवस्थापनाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, निवडणूक ही केवळ मतदान प्रक्रिया नसून लोकांचा विश्वास जिंकण्याची संधी आहे. मतदार यादी पडताळणी, घराघर संपर्क, जनसंपर्क मोहीम, प्रभावी मतदारांशी संवाद आणि सातत्यपूर्ण सेवाभाव या माध्यमातूनच लोकांच्या मनात स्थान निर्माण होते, प्रशिक्षण वर्गाच्या शेवटी त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना समाजासाठी अधिक जबाबदारीने काम करण्याचे आवाहन केले. “येथून बाहेर पडताना प्रत्येक कार्यकर्ता अधिक आत्मविश्वासपूर्ण, अधिक सक्षम आणि अधिक जबाबदार झाला पाहिजे. असे ते यावेळी म्हणाले.