Advertisement

जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

मुंबई, दि. 29 : चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात वनक्षेत्रातील जमिनी असलेल्या शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील विधिमंडळाच्या मंत्रिमंडळ सभागृहात जिवती तालुक्यातील वनपट्ट्यांबाबत बैठक पार पडली. यावेळी वनमंत्री गणेश नाईक, आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके, आमदार देवराव भोंगळे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिवती तालुक्यातील अनेक गावांची नोंद महसूल अभिलेखात गाव म्हणून असली, तरी वन विभागाच्या नोंदीत ती राखीव वनक्षेत्र म्हणून असल्याने अनेक शेतकऱ्यांना डिजिटल सातबारा, पीएम-किसान योजनेसह विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 1980 पूर्वीच्या जमिनींसाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असल्यास त्या वनक्षेत्रातून वगळण्याची प्रक्रिया तुलनेने सुलभ आहे. मात्र, 1980 नंतरच्या जमिनींसाठी वनसंवर्धन कायद्यानुसार स्वतंत्र मंजुरी आवश्यक असल्याने अनेक प्रस्ताव कागदपत्रांच्या अभावामुळे प्रलंबित किंवा नामंजूर होत आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात राज्याची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी आवश्यक कायदेशीर कार्यवाही करण्याचे तसेच संबंधित गावांचे सर्वेक्षण करून आवश्यक पुरावे संकलित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

डिजिटल सातबारा उपलब्ध नसलेल्या शेतकऱ्यांना ऑफलाइन सातबारा उपलब्ध करून देत पीएम-किसान योजनेसह विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

तेलंगणा सीमेलगतच्या जिवती तालुक्यातील 15 गावांमधील शेतजमिनींचे हक्क निश्चित करून सातबारा अभिलेखात समाविष्ट करण्याबाबत विभागीय आयुक्तांच्या समितीने केलेल्या शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

याशिवाय घरकुल योजना, बसस्थानक, सिंचन तलाव, नगरपंचायत क्षेत्रातील विकासकामे तसेच इतर मूलभूत सुविधांबाबतही तातडीने मार्ग काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. तसेच तालुक्यात कोतवाल पदांची निर्मिती करण्यात येत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

बैठकीत आमदार देवराव भोंगळे यांनी जिवती तालुक्यातील वनजमिनींचा प्रश्न तातडीने सोडवून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली.