Advertisement

गडचिरोलीत वाढत्या अवैध रेती उत्खननाविरोधात कारवाईची मागणी.

संकल्प प्रतिष्ठानचे महासचिव प्रणित तोडे यांनी प्रशासनाकडे संयुक्त मोहिमेची मागणी.

गडचिरोली जिल्ह्यात वाढत्या अवैध रेती उत्खननाच्या प्रकारांमुळे पर्यावरणासह शासनाच्या महसुलाचे नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रणित तोडे यांनी संबंधित विभागांनी तातडीने संयुक्त कारवाई मोहीम राबवावी, अशी मागणी केली आहे.

प्रेस नोटनुसार, जिल्ह्यातील विविध नदीपात्रांमधून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन व वाहतूक सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे नदीपात्रांचे नुकसान होत असून पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

तसेच रेती वाहतूक करणाऱ्या जड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था होत असून स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. काही ठिकाणी भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढल्याचीही चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि खनिज विभाग यांनी संयुक्त विशेष मोहीम राबवून अवैध रेती उत्खननावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रणित तोडे यांनी केली आहे. तसेच अवैध उत्खनन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून रेती वाहतूक करणारी वाहने जप्त करण्यात यावीत व नियमित तपासणी मोहीम राबवावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

                                             — प्रणित तोडे

                             महासचिव, संकल्प प्रतिष्ठान