आ.मुनगंटीवार यांनी प्रयोगशाळा, मनुष्यबळ आणि जनजागृतीसाठी ठोस कृती आराखडा राबविण्याची व्यक्त केली अपेक्षा.आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कार्यपद्धतीचे आ.मुनगंटीवार यांनी केले कौतुक.
मुंबई- राज्यात वाढत्या अन्नभेसळीच्या घटना, निकृष्ट दर्जाच्या वैद्यकीय साहित्याचा वापर तसेच अन्न व औषध प्रशासन विभागातील मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर निर्माण होणाऱ्या परिणामांचा मुद्दा आज विधानसभेत राज्याचे माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. नागरिकांना सुरक्षित अन्नपदार्थ आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे सांगत, विभागाची क्षमता वाढविण्यासाठी प्रयोगशाळा, मनुष्यबळ आणि जनजागृती यंत्रणा अधिक सक्षम करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान आ. मुनगंटीवार यांनी राज्यात अलीकडील काळात जप्त करण्यात आलेल्या भेसळयुक्त दूध, दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, पिण्याचे पाणी तसेच अन्य खाद्यपदार्थांच्या घटनांचा संदर्भ देत अन्नसुरक्षेच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले. याशिवाय काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे वैद्यकीय साहित्य आढळून आल्याच्या घटनांमुळे नागरिकांच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त केली.
यावेळी त्यांनी राज्यात प्रस्तावित प्रयोगशाळांच्या उभारणीची सद्यस्थिती, आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता आणि जनजागृती मोहिमांबाबत माहिती मागितली. भेसळ प्रकरणांवरील कारवाई अधिक प्रभावी होण्यासाठी यंत्रणा सक्षम करणे आणि खटल्यांचा जलद निपटारा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
अन्न व औषध प्रशासन विभागातील रिक्त पदांकडेही त्यांनी लक्ष वेधले. वाढत्या जबाबदाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ असणे आवश्यक असल्याचे सांगत, रिक्त पदे तातडीने भरण्याची आवश्यकता त्यांनी मांडली. तसेच विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत सक्षम अधिकाऱ्यांना सातत्याने काम करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
या चर्चेला उत्तर देताना अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची दखल घेत विभागाची क्षमता वाढविण्यासाठी सरकार सकारात्मकपणे कार्यरत असल्याचे सांगितले. राज्यातील प्रयोगशाळा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्यासाठी केंद्र शासनाकडेही पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया गतीमान करण्यात आली असून नव्या आकृतिबंधाद्वारे मनुष्यबळ वाढविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर सरकार गंभीर असून अन्नसुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, अशी ग्वाही त्यांनी सभागृहात दिली.
नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर विधायक चर्चा घडवून आणत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी अन्नसुरक्षा आणि आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणाचा मुद्दा सभागृहात प्रभावीपणे मांडला. या चर्चेमुळे अन्न व औषध प्रशासन यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने सकारात्मक पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.









